धाराशिव ता. 26: शहरातील रस्ते, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, पाणीपुरवठा, भुयारी गटार अशा मूलभूत सुविधा देताना राजकीय कुरघोडीचा फटका सामान्य नागरिकांना बसू नये याची काळजी प्रशासनाने घ्यावी अश्या सूचना आमदार कैलास पाटील यांनी आढावा बैठकीत दिल्या.
आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ही महत्त्वपूर्ण बैठक (ता. 24) रोजी पार पडली.यावेळी अधिकाऱ्यांनी नागरी समस्याकडे गांभीर्याने पाहण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी दिल्या.
बैठकीला जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, तहसीलदार मृणाल जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी त्रिंबक ढेंगळे पाटील महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक, प्रतिनिधी उपस्थित होते.
शहरातील रस्त्यांबाबत आमदार पाटील म्हणाले, रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे असून 140 कोटीच्या कामाची फेरनिविदेची प्रक्रिया सुरु होण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी, दुसरीकडे नियोजन समितीच्याही कामाना स्थगिती आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून त्याबाबत पाठपुरावा करावा अश्या सूचना आमदार पाटील यांनी केल्या. राजकीय कुरघोडी करताना जनतेचे हाल होणार नाहीत याची काळजी अधिकाऱ्यांनी घ्यावी असं आमदार पाटील यांनी सांगितले.
शहरातील पथदिव्यांचा दुरुस्ती करणे हे नगरपालिकेचे काम आहे. कंपनी व त्याचा करार ही कारणे किती दिवस जनतेला सांगणार आहात?सण उत्सवाच्या दिवसात शहरात अंधार होणार नाही यासाठी पालिकेच्या स्तरावर दिवाबत्ती खरेदीची सोय करावी.
तुंबलेल्या गटारी, नालेसफाई होत नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. नालेसफाईच काम या कंपनीला होत नसेल तर त्याच्याकडून हे काम काढून घेऊन नवीन कंत्राट काढा. यामध्ये प्रभागनिहाय निविदा काढता येत असतील तर ते अधिक योग्य होऊन हा प्रश्न मार्गी लागेल याबाबत लवकर निर्णय घ्या असा आदेश आमदार पाटील यांनी दिला. पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर जिथं आवश्यक आहे तिथं फक्त मुरूम टाकून भागणार नाही. मुरूम टाकून त्याची दबई करून कामाच्या ठिकाणी जिओ टॅगची अट टाका अन्यथा दरवेळीप्रमाणे पुन्हा निकृष्ट काम होतील. सर्व कामे दर्जेदार झाली असतील तरच बिल काढावी अन्यथा ती कामे पुन्हा व्यवस्थित करण्यास सांगावी.
कचरा डेपोबाबत पालकमंत्री यांनी दिलेल्या साडेचार कोटीच्या बायोमायनिंग प्रकल्पाची सद्यस्थिती काय आहे? अशी विचारणा करून तातडीने त्याची प्रक्रिया पार पाडण्याच्या सूचना आमदार पाटील यांनी दिल्या. नागरी समस्या सोडविण्यासाठी कुणाची अडचण आहे. नागरिकांतुन तीव्र रोष दिसत असतानाही आपल्याकडून काहीच होत नाही. यापुढे हे खपवून घेणार नसल्याचा इशारा अधिकाऱ्यांना दिला. आमदार पाटील यांनी संबंधित विभागांना कामे वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. कार्यक्षमतेत कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करून हलगर्जी ठेकेदारांना काळ्या यादीत टाका, असे आदेशही आमदार पाटील यांनी यावेळी दिले.